आपल्याच विचारात त्या उतारावरून उतरत होते. उतार संपत आला.
थोडंसं वळून गेल्यावर समोर मुख्य रस्ता आला. आणि मग आली समोर प्रचंड गर्दी. कोपर्यावर
थांबून त्या गर्दीचे कुठूनही कसेही वाहणारे प्रवाह पहात होते. काय नव्हतं त्या
गर्दीत? गर्दीत गर्दी करणारे तरूण-तरूणींचे घोळके, खरेदीसाठी बाहेर पडलेले लोक, कानात headphones
घालूनसुद्धा अगदी रस्त्यापलीकडे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात “traffic में फँस
गया हूँ सर...” म्हणत mobile shop समोर
नवीन model (mobileचं!) बघत घुटमळणारे,
गर्दीत एकांत शोधणारे, “कित्ती गर्दी आहे!”ची तक्रार करत आपल्या अजस्र
देह आणि लवाजम्यासहीत गर्दीत घुसणारे,
गर्दीत हिरवळ शोधणारे, गर्दीत हिरवळ असणार्या, classला वेळ आहे म्हणत timepass करत फिरणारे, कुणी गर्दीत असूनही एकटे, कुणी एकटे असूनही ‘एकटे’ नसणारे... कितीतरी जण.
अशा या
गर्दीत आपण नक्की कोणत्या भूमिकेनं शिरावं असा विचार पडला होता मला. डोळे बंद
केले. बंद डोळ्यांनाही ठसठशीतपणे जाणवावं असं अस्तित्व होतं त्या गर्दीचं. कानांत
असंख्य गलके ऐकू येत होते... डोळे उघडले. तीच गर्दी. चेहरे बदलत असले तरी गर्दी
तीच. फूटपाथच्या काठावर उभी होते. फक्त एका पावलाचं अंतर होतं त्या गर्दीत आणि
माझ्यात...
खरंतर
गर्दी ही काही विचित्र किंवा वाईट गोष्ट नाहीये. तरीही त्या खांबाला टेकून मी
गर्दीत जावं, शिरावं,
घुसावं की झोकून द्यावं याचा विचार करत होते. ती गर्दी आपली कुणीही नसली तरी
आपल्याला किती पटकन सामावून घेते ती आपल्यात. त्या गर्दीचाच एक भाग होऊन जातो आपण.
लांबून बघितलं तर वेगवेगळे रंग इकडून तिकडे प्रवाहीत होताहेत असं वाटतं. रंग
पाण्यात टाकला तर त्याला आपण त्याला ‘रंग’ नाही म्हणत, ‘रंगाचं पाणी’ म्हणतो. तर असे हे या ‘रंगाच्या पाण्या’वर तरंगणारे रंगीत ठिपके माझ्यासमोरून इथे-तिथे बागडत होते.
या ठिपक्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्या गर्दीपासून लांब जाण्याची
गरज नाही. गर्दीत राहून गर्दीबरोबरचं होता आलं पाहिजे आणि तरीही हे नेहमी लक्षात
ठेवलं पाहिजे की आपलं अस्तित्व काय आहे. मगच ‘रंगूनी रंगात सार्या,
रंग माझा वेगळा’ची मजा कळेल. कितीतरी रंग लांबूनएकसारखे दिसत असले तरी जवळ
गेल्यावर त्यातल्या छटा मन मोहून टाकतात. तेच त्यांचं वेगळेपण असतं.
धक्का लागला म्हणून
बाजूला बघितलं तर एक लहान मुलगा आपलं दप्तर सांभाळत गोड हसून “सॉरी” म्हणत निघून गेला. काही क्षण तो गेला त्या दिशेला
बघत बसले होते मी. मग लक्षात आलं, मघाशी उभी होते ते ठिकाण खूपच मागे पडलं होतं. विचारांच्या
गर्दीनं मनात शिरकाव केला होता, पावलं या गर्दीत तेव्हाच
मिसळून गेली होती.
-कायांप्रि
Comments
Post a Comment