Skip to main content

नशीब


नशीब... अजब गोष्ट आहे. कुठे असतं? माहीत नाही. कसं दिसतं? माहीत नाही. कुणाकडे मिळतं? माहीत नाही.


लक्ष्याकडे सगळे धावतात. हाजिर तो वजीरच्या न्यायाने आधी पोचणार्‍याला ते लक्ष्य साध्य होतं. जे नाही पोचत त्यांचं... नशीब हुकतं.


सगळं पदरात पडून टिकत मात्र नाही. दोष कुणाचा? अर्थातच नशिबाचा.


घरात अचानक लक्ष्मी पाणी भरायला लागते. कशामुळं?नशीब फळफळतं म्हणून.


अपघाताचा सुरा आयुष्य चिरत जातो आणि आपण म्हणतो नशीब फाटलं.


सगळे मार्ग बंद होतात. शेवटचा प्रयत्न म्हणून दारावर थाप मारावी तर दार आधीच उघडलेलं. कसं?नशिबाचे दरवाजे सताड उघडे पडले म्हणून.


भरलं घर फुटून जातं. नात्यांचे तुकडे होतात. कारण?नशीब फुटलेलं असतं त्यांचं.


दरोडे होतात. खून पडतात. का? कारण तो त्यांच्या नशिबावरच पडलेला घाला असतो म्हणून.


अनेकदा आयुष्याचा जुगार खेळत असतो आपण. पण हरतोच बर्‍याचदा. दोष कुणाचा?नशिबाचे फासे उलटे पडले, अजून काय!


रंगांनी भरत चाललेलं चित्र एकदम बेरंगी होऊन जातं. कसं?नशीब फिसकटतं म्हणून.


जंगलात भरकटलेला अचानकच योग्य रस्त्यावर येऊन उभा रहतो. अचानक? नाही. त्याचंनशीब त्याला तिथं घेऊन येतं.


प्रमोशन सतत हुलकावणी देत राहतं. का?नशिबाचा चकवा. दुसरं काय!


मदतीचा हात देणार्‍याच्या डोक्यावर पाय देऊन जेव्हा यशाचे गड सर केले जातात, ते श्रेय असतं नशिबाचं.


कुणीतरी घरदार सोडून नवीन काहीतरी शोधायला बाहेर पडतं. आपलं नशीब आजमावायला.


आपल्या चुकांचं खापर फोडायला जेव्हा कुणीच मिळत नाही तेव्हा पुढं येतं ते नशीब.


दुःख प्रत्येकाच्या वाट्याला का येतं?नशिबाचे भोग आहेत, दुसरं काय!


बंद पडलेली गाडी अचानक कशी सुरू होते?नशिबाची किल्ली फिरल्यामुळे.


संकटं एकटी येत नाहीत. हातात हात घालून येतात एकामागोमाग एक. का बरं?नशिबाचा फेरा कुणाला चुकलाय का महाराजा!


काय आहे नशीब? वस्तू? व्यक्ती? प्राणी? नक्की काय? माहीत नाही. तरीही त्याच्यावर विसंबून राहता येतं, त्यावर विश्वास असतो, त्याच्यावर आरोप करता येतो, त्याचे आभार मानता येतात. त्याची जशी साथ असते, तसं ते साथ सोडूनही जाऊ शकतं. कधी ते फळफळतं, कधी हुलकावणी देतं. कधी जिंकतं, तर कधी त्याच्यावर मातही करता येते.


नशीब ना जिवंत आहे, ना ते मर्त्य आहे. ना सजीव आहे, ना निर्जीव. ना ते चर आहे, ना अचर. ना आहे दृश्य, ना अदृश्य. नाही ते स्पर्श्य, ना ते अस्पर्श्य. ना जिंक्य आहे, ना अजेय आहे. हवा दिसत नसली तरी जाणवते. पण नशीब? त्याला ना रंग, ना रूप;ना रोख, ना दिशा. त्याचं अस्तित्व कुठे आहे कुणालाच माहीत नाही. ते कसं आहे नक्की तेही कुणाला ठाऊक नाही. त्याला कधी कुणी भेटलं नाही, कधी बघितलं नाही. तरीही नशीब मानणारे आहेत, ते आजमावणारेही आहेत. त्याच्यावर हवाला ठेवणारे आहेत, आणि त्याच्याकडून ठेच खाणारेही आहेतच.


मग काय आहे नशीब? कल्पना? संकल्पना? समज? गैरसमज? विश्वास? अंधविश्वास? माहीत नाही.


काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. काहींचे अर्थ कळत नाहीत, तर काही आकलनापलीकडच्या असतात. मग करायचं काय अशा गोष्टींचं?


काही नाही. सोडून द्यायच्या त्यांच्या त्यांच्या नशिबावर




-कायांप्रि 

Comments

Popular posts from this blog

Dreams

  Though he cried a little At least he cried a little   Maybe he caused some troubles But always gave the doubles   Dreamt of impossible Behaved unreasonable But with passion incomparable   The more he fight The more the delight The higher his dreams took flight   Fell, trampled over Tricked, tripped, but lost never   Always a believer Always a dreamer - Kayanpri 

What Are You?

A person is like a photograph. When we alter that photo with some photographic effects, the perception of looking at that photo changes though it’s the same photograph. Every photo contains same basic colors. We intensify some of the colors from some of the points, we get a different look. We take it in a black and white form, we can’t see the colors of the picture. Take it in colorful form, barely can see the simplicity. Then what makes the difference? Lights, camera, mood, situation, angles, depth, focus, colors, photographer’s view point, viewer’s point of view and so on… A person is like a dish. It’s made up of various ingredients and sometimes, forms a totally different taste. Every dish, too, has some same basic ingredients. With these same ingredients, number of dishes could be made. So if every dish is made up of some same ingredients, why it tastes different? The way of making it, cooking style, process, sequence of adding ingredients, time, temperature, heat, prese...

कंटाळा

  कधी कधी कंटाळा येतो . मग खूप कंटाळा येतो . मग इतका कंटाळा येतो की कंटाळा यायचासुद्धा कंटाळा येतो . अशावेळी काहीतरी लिहावंसं वाटतं . पण उठून पेन - कागद घ्यायचा कंटाळा येतो . मग विचारांची भेंडोळी सोडवत बसते मी मनातल्या मनात . त्या भेंडोळ्यांमध्ये सापडतात अनेक विचार , माणसं , प्रसंग , गोष्टी , आठवणी आणि बरंच काही . बरंच काही जे त्या भेंडोळ्यांमध्ये कायमचं हरवून जावंसं वाटतं . बरंच काही जे कधीच कुणाला कळू नये असं वाटतं . बरंच काही जे पुन्हा कधी नजरेला पडू नये असं वाटतं . असं बरंच काही आहे जे बऱ्याचदा वाटतं. पण कितीही वाटलं तरी मन कुठे ऐकतं ? ते पुन्हा शिरतं त्या भेंडोळ्यांच्या गुंतागुंतीत . मन गुंतवायचा तसा हा एक चांगला मार्ग आहे . पण गुंतण्याऐवजी कधी कधी नुसतीच गुंतागुंत वाढत राहते . त्या गुंत्याची गर्दी वाढत जाते . आजूबाजूला पसारा वाढत जातो   आणि मग तो पसारा आवरायचा जाम कंटाळा येतो . मग तो पसारा तसाच टाकून उठते मी . मन तर शांत झालेलंच नसतं . पण आता ...